मुंबई : महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीनंतरचा सत्तासंघर्ष एख्यादा सिनेमातील कथानकाप्रमाणे घडला होता. शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी आपल्या एका मुलाखती दरम्यान सांगितलेच होते की जो एक महिना संयम पाळेल तो ही लढाई जिंकेल. त्या पद्धतीने शिवसेनेने ही लढाई जिंकली देखील आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले
मात्र भाजप त्यांच्यावर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. आपल्या एका मुलाखती दरम्यान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीची सत्ता स्थापनेसाठी ऑफर होती, असा गौप्यास्पोट केला. शिवसेनेने पाठ फिरवल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाची व आपलीही राष्ट्रवादीशी बोलणी झाली होती. राष्ट्रवादी व भाजपने एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचे ठरले होते. तसेच हे अजित पवार यांच्यासोबत नव्हे, तर थेट राष्ट्रवादीसोबत ठरले होते, शिवसेनेनं आपल्याला दगा दिला, शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलाच नव्हता, असं त्यांनी म्हटलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांकडून आम्हाला सत्तास्थापनेची ऑफर होती. असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देखील बोट दाखवले मात्र, शिवसेनेला वगळून आम्हाला राज्यात सरकार स्थापन करायचं नाही अशी आमची भूमिका होती, असा दावाह फडणवीसांनी या मुलाखतीत केला होता.
आता राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर मिळाले आहे
शिवसेनेला सोडून राज्यात सत्ता स्थापन करायची नाही अशी भाजपची भूमिका होती तर शिवसेनेला मुख्यमंत्रिपद का दिलं नाही, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस हे अजूनही भ्रमित अवस्थेत आहेत. ते करत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांना शिवसेनेला सोडायचं नव्हतं, तर त्यांनी सेनेला मुख्यमंत्रीपद का दिले नाही, असा प्रश्न चव्हाण यांनी विचारला. ‘राज्यात महाविकास आघाडीचं सरकार चांगलं काम करत आहे. फडणवीस यांनी हे वास्तव स्वीकारायला हवं, असा चिमटादेखील त्यांनी घेतला.