नवी दिल्ली : भारत-चीन प्रश्नावर चर्चा करायची असेल तर आम्ही घाबरत नाही. १९६२ पासून काय काय घडले यावर संसदेत एकदा दोन हात होऊनच जाऊ दे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी काँग्रेससह विरोधकांना आव्हान दिले. ते रविवारी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षानंतर काँग्रेसकडून मोदी सरकारला सातत्याने धारेवर धरले जात आहे. चीनविषयक मोदी सरकारच्या धोरणांवर काँग्रेसकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘सरेंडर मोदी’, असे संबोधले होते.
अमित शहांनी एनएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, कोरोना आणि सीमारेषेवरील वादावरील प्रश्नांना उत्तरे दिली. लाईन ऑफ एक्च्युअल कंट्रोलवर भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत ही लढाई जिंकत असल्याचं मला आधीच स्पष्ट करावे लागेल, असे अमित शहांनी म्हटले. तसेच, देशातील आणीबाणीवर बोलताना काँग्रेसवर हल्लाही चढवला. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून रोजी आणीबाणी जाहीर करुन देशातील लोकशाहीच्या मुळावर घाव घालण्याचं काम केलंय. हा कुठल्याही पक्षावर नसून देशाच्या लोकशाहीवर केलेला हल्ला होता, असेही शहा यांनी म्हटले.
कोरोनाची लढाई भारताने अत्यंत स्थैर्याने आणि धैर्याने लढली आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात कोरोनाची लढाई अत्यंत धैर्याने आपण लढलो आहोत. जगाच्या तुलनेत आपण करोनाशी अत्यंत उत्तमरित्या लढलो आहोत. आपल्याकडे परिस्थिती जगाच्या तुलनेत बरीच नियंत्रणात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आणि दिवे लावले गेले, घंटा वाजवल्या गेल्या. एकाही पोलिसाशिवाय कर्फ्यू पाळला गेला. यासारखी बाब मी तरी माझ्या कारकिर्दीत पाहिलेली नाही असं अमित शहा म्हणाले.