Latest Marathi News

BREAKING NEWS

उष्माघात किंवा सन स्ट्रोक जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

0

खारघरमधील एका कार्यक्रमात उष्माघातामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला होता. तसेच मुंबई पोलीस भरतीसाठी मैदानी चाचण्या सुरु आहेत, त्यामध्ये आतापर्यंत ४ उमेदवारांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यात वाढत्या तापमानाचे बळी जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेने आपला विक्रम मोडीत काढला आहे. उन्हामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.

देशातील अनेक भागात पारा ४५ अंशांवर पोहोचला असून उष्माघातापासून वाचण्यासाठी लोक अनेक मार्गांचा अवलंब करत आहेत. बऱ्याच जणांना खरोखरच उष्माघाताबद्दल नीट माहिती नसते. त्यामुळे उष्माघात म्हणजे काय, त्याची लक्षणे कोणती आणि कोणत्या घरगुती उपायांनी उष्माघातापासून मुक्ती मिळू शकते याबद्दल प्राथमिक माहिती जाणून घेऊया.

उष्माघात म्हणजे काय?

उष्माघात याला सामान्यत : ‘लू लागणे’ असे म्हणतात. जेव्हा तुमचे शरीर तापमान नियंत्रित करू शकत नाही तेव्हा अशी स्थिती निर्माण होते. उष्माघातात शरीराचे तापमान झपाट्याने वाढते आणि त्वरित ते कमी करता येत नाही. एखाद्याला उष्माघात झाला की व्यक्तीला शरीरात अजिबात घाम येत नाही. उष्माघातानंतर १० ते १५ मिनिटांत शरीराचे तापमान १०६°F किंवा त्याहून अधिक वाढू शकते. यावर वेळीच उपचार न केल्यास मानवी मृत्यू किंवा अवयव निकामी होऊ शकतात.

उष्माघाताची लक्षणे काय?

उष्माघाताची लक्षणे दिसल्यास वेळीच उपचार घ्यावा. त्यामुळे उष्माघाताची सर्व लक्षणे माहिती असणे गरजेचे आहे. डोकेदुखी, स्मृतिभ्रंश, उच्च ताप, शुद्ध हरवणे, मानसिक स्थितीत बिघाड, मळमळ आणि उलटी होणे, त्वचा लाल होणे, हृदयाची गती वाढणे, त्वचा मऊ होणे, त्वचा कोरडी पडणे.

उष्माघाताची कारणे काय आहेत?

गरम वातावरणात दीर्घकाळ राहिल्याने उष्माघात होऊ शकतो. जर कोणी अचानक थंड वातावरणातून उष्ण ठिकाणी गेले तर त्याला उष्माघात होण्याची शक्यता असते. उष्माघाताचे एक मुख्य कारण गरम हवामानात अति व्यायाम करणे हे देखील आहे. उन्हाळ्यात जास्त घाम आल्यावर पुरेसे पाणी न प्यायल्याने देखील याचा त्रास होऊ शकतो. जर कोणी जास्त प्रमाणात मद्यपान केले तर शरीराचे तापमान सुधारण्याची शक्ती कमी होते.

Leave A Reply

Your email address will not be published.