कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पेटला आहे. एकीकडे याच प्रश्नावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे पंढरपूरमधील स्थानिकांनी आता कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा दिला आहे.
पंढरपूर कॉरीडोरला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिकांकडून आता कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. काय आहे स्थानिकांची मागणी? सध्या पंढरपूर कॉरीडोरचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या कॉरीडोरला स्थानिकांकडून विरोध करण्यात येत आहे. कॉरीडोरला विरोध करण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिरच्या पश्चिमद्वाराजवळ नागरिकांनी लाक्षणिक उपोषण देखील केलं आहे.
याच पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांकडून आता थेट कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्य सरकारने योग्य दखल न घेतल्यास पुढील आषाढी एकादशीच्या महापुजेला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलावण्याचा इशारा पंढरपूरमधील नागरिकांनी दिला आहे. यावर आता सत्ताधारी आणि विरोधक काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.