महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज गोंदियामध्ये आहेत. यावेळी बोलताना त्यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. नाना पटोले यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना औषधोपचाराची गरज आहे, असा खोचक टोला विखे पाटील यांनी लगावला आहे. आता या टोल्यामुळे कधीकाळी काँग्रेसचे विरोध पक्षनेते राहिलेले विखे पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात वाद अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगासंदर्भात महात्मा गांधी यांची कॉपी करून तत्त्वाचे भांडवल केले, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्याचा समाचार राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला व नाना पटोले प्रसिद्धीसाठी असे करीत आहेत, असा पलटवारदेखील विखे पाटील यांनी यावेळी केला. आदित्य ठाकरेंना खूप काही शिकायचे आहे. त्यामुळे त्यांनी कोणाला फुकट सल्ला देऊ नये, असे परखड मत पाटील यांनी व्यक्त केले.
दरम्यान, विरोधी पक्षनेते आंबदास दानवे यांनी भाजप-शिंदे सरकारच्या बसलेल्या कानठळ्या आदित्य ठाकरे उठवणार, असे वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना विखे पाटील म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी कोणाला सल्ला देऊ नये. मी आंबदास दानवे यांना कोणताही सल्ला देणार नाही. सध्या त्यांचे कोणीही ऐकत नसल्याने दानवे असे वक्तव्य करत आहेत, असे ते म्हणाले.