मुंबई : सामनाचे कार्यकारी संपादक खा. संजय राऊत यांनी सामनाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर मुलाखत घेतली आहे, याचा पहीला भाग आज सकाळी प्रदर्शित झाला आहे. संजय राऊत सातत्याने विविध माध्यमातून महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या भूमिकेवर खासकरून कोरोना संदर्भातील भूमिकेवर सतत प्रहार करत असतात. त्यांनी याच संबंधी मुख्यमंत्र्यांना बोलतं केलं
देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावरून प्रश्न
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते यांनी मध्यंतरी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी दिल्ली दरबारी वारी केली होती. या भेटीवर राजकीय वर्तुळात अनेक कयास लावण्यात आले होते. कित्येकांनी याला ‘ऑपशन लोटस’चं देखील नाव दिलेलं. या सर्व चर्चांना देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम देखील दिला होता. फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता “पोटदुखी हे देखील कोरोनाचे लक्षण असू शकते” असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले, कोरोना हे संकट इतके अकस्मात आले की याच्यावर कोणीही तज्ञ आहे असे सांगू शकत नाही. यंत्रणेत काही त्रुटी राहत असतील तर त्या आम्हाला सांगाव्या आम्ही सुधार करू. याआधी मी सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेतली असताना देखील सर्वांना सांगितलं होतं विणासंकोच आपले मत मांडा, अशीच बैठक मी यापुढेही घेणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीत सांगितले.