मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान ‘राजगृह’ मुंबईमध्ये दादर इथे आहे. मंगळवारी रात्री काही अज्ञात माथेफिरूंनी इथे तोडफोड केली. कुंड्यांची, झाडांची आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नासधूस केली. याबद्दल राज्यात आणि राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत.
गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आरोपींची गाय केली जाणार नाही. आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील शासनाने याची गंभीर दखल घेतली असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून तपासकार्य सुरु केले आहे.
आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी असे दुष्कृत्य करणाऱ्या समाजविघातक शक्तींच्या वाईट हेतूला बळी पडू नये. शांतता, संयम पाळावा, एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
महामानव डॉ. बाबासाहेबांचे कार्य आणि विचार समाजमनात खोलवर रुजले आहेत, आपल्या सर्वांची त्यांच्यावर भक्कम श्रद्धा आहे, त्या श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.