बार्शी |
बार्शी-सोलापुरातून सहकुटुंब मुंबईला स्थलांतरित होवून तेरा महिने झाले.जी उद्दीष्टे आणि स्वप्ने घेऊन मी मुंबई गाठली, त्या पैकी काही पूर्ण झाली आणि काही पाईप लाईनमध्ये आहेत.. फक्त “शो मस्ट गो ऑन” म्हणत जगत राहणे मला कधीच रुचले नाही. त्यामुळे वास्तववादी टार्गेटस् आणि स्वप्नांचा बेतोड परिश्रम घेत धडपडत राहाणे,हा माझा पिंड! या पिंडाला धडधाकट प्रकृतीची जोडही असायलाच हवी.स्व.अक्का-बापूंच्या कृपेने शुगर-बीपी या विकारांना माझ्या कडे थारा नाही.पण कोविडनंतर जीवनाच्या विस्कटलेल्या घडीमुळे शरीराच्या वजनाकडे दुर्लक्षच झाले आणि माझ्या वजनाच्या काट्याने ९१ किलोचा पल्ला गाठला!मग काय माझ्या मुंबईतल्या उद्दीष्टांमध्ये वजन कमी करणे,या आणखी एका टार्गेटची भर पडली.अखेर मुंबईतील प्रसिद्ध फिटनेस आणि डायटिशन डॉ.दिपेश पाटील यांच्याशी संपर्क झाला.
रक्ताच्या तपासण्या करुन त्यांनी त्यानुसार फक्त फळे आणि भाज्या हाच आधार असलेला २६ दिवसांचा डायट प्लॅन दिला. तो ५ एप्रिल रोजी सुरु झाला आणि काल म्हणजे महाराष्ट्र दिनी पूर्ण झाला. डॉ.दिपेश पाटील, त्यांच्या पत्नी सौ.हर्षा पाटील यांचा रोजचा पाठपुरावा आणि माझी पत्नी सौ.मंदा हिने माझ्या आहाराची घेतलेल्या काळजीला मी जिद्द आणि निग्रहाची जोड दिली.अगदी तिसऱ्या दिवसापासून वजन कमी होणे सुरु झाले.२६दिवसांचा कोर्स पूर्ण झाला तेंव्हा माझे वजन चक्क ९ किलोंनी घटले.अशक्तपणा नाही ना उत्साहात कमी नाही… धन्यवाद डॉ.दिपेश!
-राजा माने
संपादक, राजकीय विश्लेषक व माध्यम तज्ज्ञ.
अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.