Latest Marathi News

BREAKING NEWS

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे खा. संभाजीराजेंच्या या मागण्या

0

कोल्हापूर : सारथी संस्थेबाबत आठवडाभर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. संस्थेबाबत शासनस्तरावर उदासीनता असल्याचा आरोप खा. संभाजीराजे यांनी केला होता. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यातून उचल खाल्ली होती. सारथीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खा. संभाजीराजे यांची उद्या बैठक होत आहे. या बैठकीत खा. संभाजीराजे यांनी सहा मागण्या ठेवणार आहेत. तसेच सारथी बाबत आणखी याव्यतिरिक्त मागण्या असल्यास त्या कळविण्याचे आवाहन सोशल मीडियाद्वारे खा. संभाजीराजे यांनी केले आहे.
आपल्या फेसबुकवॉल वरील पोस्ट द्वारे खा. संभाजीराजे यांनी पुढील माहिती देऊन आवाहन केले आहे.
मराठा समाजाच्या हितासाठी स्थापन झालेल्या व प्रचंड त्यागातून मिळवलेल्या सारथी संस्थेबाबत समाजाने जे आंदोलन उभं केलं आणि दबाव निर्माण केला त्याचा आदर करत सरकारने चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे.
मा. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मला फोन करून मुंबईला चर्चेसाठी येण्याची विनंती केली. काही महिन्यांपूर्वी समाजाच्या वतीने पुण्यात सारथी कार्यालयाच्या बाहेर लाक्षणिक उपोषण केले होते. त्यावेळी जी आश्वासने सरकार ने दिली होती, ती न पाळल्याचा अनुभव गाठीशी असताना सुद्धा समाजाच्या तीव्र भावना सरकार पर्यंत पोहचवणे हे माझे कर्तव्य समजून पुन्हा चर्चेला जाण्याचा निर्णय घेत आहे. माझ्यासाठी समाजाचे हित सर्वोच्च आहे.

समाजाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या जाहीर आहेत. पैकी ,
1)सारथी ही ‘स्वायत्त’ संस्था म्हणून टिकली पाहिजे. स्वायत्तते बाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
2) जे अध्यादेश राज्यपाल शासन असताना गुप्ता नावाच्या अधिकाऱ्याने काढले ते सर्व रद्द केले पाहिजेत.
3) शासनाने कथित गैरव्यवहाराची चौकशी केली, तिच्या मध्ये काही तथ्ये आढळली का? किती रुपयांचा घोटाळा झाला? हे शासनाने जाहीर करावे. झालेला सर्व जमाखर्च हा ऑनलाईन करावा, अन्यथा सारथी ची जाणीव पूर्वक बदनामी केली म्हणून जबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी.

4) तारदूत प्रकल्प हा समाजोपयोगी असून तो बंद करण्यात येऊ नये. उलट त्याची व्याप्ती वाढवण्यात यावी.
5) ज्या लाभार्थी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळाली नाही ती लवकरात लवकर देण्यात यावी.
6) शासनाने नवीन कोण कोणत्या योजना कल्पिल्या आहेत, त्या जाहीर करण्यात याव्यात.

गरीब मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन झालेली ही संस्था स्वायत्त तर राहिली पाहिजेच. पण तिला जास्तीत जास्त निधी दिला गेला पाहिजे.

वरील प्रमुख मागण्या ह्या प्रथमदर्शनी मला दिसल्या. या व्यतिरिक्त अजून काही मागण्या असतील तर जाणकारांनी त्या मला कळवाव्यात. कंमेंट बॉक्स मध्ये व तसेच,
office@sambhajichhatrapati.com या इमेल वरती आपण लवकरात लवकर पाठवणे इष्ट राहील.

Leave A Reply

Your email address will not be published.