Latest Marathi News

BREAKING NEWS

वर्षातून २ वेळा होणार सीबीएसई बोर्ड परीक्षा

0


नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने दहावीच्या परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सीबीएसईच्या नव्या निर्णयानुसार एका वर्षात सीबीएसईकडून दोनवेळा परीक्षा घेतली जाणार आहे. सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सीबीएसईने वर्षातून दोन वेळा परीक्षा आयोजित करण्याच्या मॉडेलला मंजुरी दिली आहे. पहिली परीक्षा फेब्रुवारी आणि दुसरी परीक्षा मे महिन्यात आयोजित केली जाणार आहे.


दहावीच्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी महिन्यातील पहिली परीक्षा देणे अनिवार्य करण्यात आले आहे. दुस-या परीक्षेतील सहभाग ऐच्छिक ठेवण्यात आला आहे. पहिल्या परीक्षेत ज्यांना गुण कमी मिळाले, ते दुसरी परीक्षा देऊन गुण वाढवू शकतात. मात्र, नव्या नियमांनुसार अंतर्गत मूल्यमापन वर्षातून एकदाच केले जाणार आहे. सीबीएसईने तयार केलेल्या ड्राफ्टनुसार सीबीएसईकडून दहावीची पहिली परीक्षा फेब्रुवारी महिन्यात आयोजित केली जाईल. ही परीक्षा १७ फेब्रुवारी ते ६ मार्चदरम्यान आयोजित केली जाणार आहे. दुस-या टप्प्यातील परीक्षा ५ ते २० मेमध्ये आयोजित केली जाणार आहे.


पहिल्या आणि दुस-या टप्प्यातील परीक्षांसाठी अभ्यासक्रम एकच असेल. दोन्ही परीक्षा पूर्ण अभ्यासक्रमांवर आधारलेली असेल. दोन्ही परीक्षांसाठी परीक्षा केंद्रदेखील एकच असेल. परीक्षा अर्ज दाखल करतानाच दोन्ही परीक्षांचे शुल्क जमा करावे लागेल. पहिल्या परीक्षेतील गुणांवर समाधानी नसलेल्या विद्यार्थ्यांना दुसरी संधी म्हणून दुस-यांदा परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.
विद्यार्थ्यांना गुण
वाढवण्याची संधी

एखाद्या विद्यार्थ्याने दोन्ही परीक्षा दिल्या तर कोणते गुण ग्रा धरणार असा प्रश्न पडू शकतो. सीबीएसईच्या नियमानुसार दोन्हीपैकी ज्या परीक्षेत गुण जास्त असतील, ते गुण ग्रा धरले जातील. पहिल्या परीक्षेत चांगले गुण मिळाले आणि त्या तुलनेत दुस-या परीक्षेत गुण कमी मिळाले तर पहिल्या परीक्षेतील गुण ग्रा धरले जातील.

Leave A Reply

Your email address will not be published.