Latest Marathi News

BREAKING NEWS

वाढीव मतदानाची याचिका हायकोर्टाने फेटाळली

0


अ‍ॅड. आंबेडकर यांना धक्का, अतिरिक्त मतांचा प्रश्न निकाली
मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालावर सर्वच विरोधी पक्षांनी शंका उपस्थित करत निवडणूक आयोगाला लक्ष्य केले होते. विशेष म्हणजे शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सायंकाळी ६ नंतर वाढलेल्या ७६ लाख मतदारांचा आकडा संशयास्पद असल्याचे म्हटले होते. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. कोर्टाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून २५ जून रोजी निकाल देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज अ‍ॅड. आंबेडकर यांची याचिका फेटाळली. तसेच न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याचे निरीक्षण नोंदवले.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अनेकदा महाराष्ट्रातील निकालावर शंका उपस्थित केली होती तर दोनच दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागूपरमधील मतदारसंघातील मतांची आकडेवारी शेअर करत प्रश्न उपस्थित केला होता. भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही काँग्रेसला आकडेवारीसह प्रत्युत्तर देण्यात आले. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या वतीने ७६ लाख मतदारांचा मुद्दा उपस्थित करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, प्रकाश आंबेडकर यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ६ वाजल्यानंतर अचानक रहस्यमय पद्धतीने वाढलेल्या ७६ लाख मतांबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
याचिकाकर्त्यांनी
वेळ वाया घालवला
याचिकाकर्ते आणि आमचा कालच्या कामकाजाचा वेळ वाया घातला, असे निरीक्षणही हायकोर्टाने निर्णय देताना नोंदवले. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वादावर आता न्यायालयाने स्पष्ट निर्णय दिला. न्यायालयाच्या निर्णयानंतर आता अ‍ॅड. आंबेडकर गुरुवारी आपली भूमिका मांडणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.