Latest Marathi News

BREAKING NEWS

राज्यसभेतही वक्फ विधेयक मंजूर

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभेनंतर राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळाली. गुरुवार, दि. ३ एप्रिल रोजी १२ तासांच्या चर्चेनंतर रात्री २.३० वाजता विधेयकावर शिक्कामोर्तब झाले. तत्पूर्वी या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण पाहायला मिळाले. या अगोदर लोकसभेत बुधवारी (२ एप्रिल) मध्यरात्री वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले. लोकसभेच्या पाठोपाठ राज्यसभेत देखील गुरुवारी (३ एप्रिल) मध्यरात्री २.३० वाजता वक्फ सुधारणा विधेयक १२८ विरुद्ध ९५ मतांनी मंजूर झाले.

वक्फ सुधारणा विधेयकावर राज्यसभेत १२ तासांपेक्षा जास्त चर्चा झाली. या मॅरेथॉन चर्चेनंतर अखेर वक्फ विधेयक मंजूर झाले. या विधेयकाच्या बाजूने १२८ मते पडली, तर या विधेयकाच्या विरोधात ९५ मते पडली. आता हे विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवले जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल.

दरम्यान, मंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत बोलताना विरोधकांवर जोरदार टीका केली. वक्फ सुधारणा विधेयक मुस्लिमांच्या विरोधात नाही. फक्त वक्फ मालमत्तांचे नियमन आणि व्यवस्थापन सुधारण्याच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेले आहे. याला कॉंग्रेससह विरोधकांनी कडाडून विरोध केला. परंतु अखेर हे विधेयक राज्यसभेतही मंजूर झाले. आता हे विधेयक आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवले जाईल. त्यांनी अधिसूचना जारी केल्यानंतर हा कायदा लागू होईल, असे मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.

राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मांडताना किरेन रिजिजू यांनी इंडिया आघाडी मुस्लिमांची दिशाभूल करत असून हे विधेयक मुस्लिम विरोधी नाही, ते गरीब मुस्लिमांच्या विकासासाठी आणले गेल्याचा दावा केला. आत्ता वक्फच्या ८.७२ लाख मालमत्ता आहेत. २००६ मध्ये सच्चर समितीच्या आकडेवारीनुसार वक्फच्या ४.९ लाख मालमत्ता होत्या. त्यातून १२ हजार कोटींचे उत्पन्न अपेक्षित होते. आता तर वक्फची संपत्ती वाढली आहे. त्यातून किती उत्पन्न मिळू शकते याचा विचार करा. या उत्पन्नातून गरीब मुस्लिमांचे कल्याण करता येऊ शकते, असा ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.