उमरगा |
गेल्या चार दिवसापासुन लातूरच्या शासकिय रुग्णालयात अतिदक्षता कक्षात उपचार सुरु असलेल्या आकाश बाळू जगताप उर्फ “अवकाळ्या” याचा रविवारी (ता. २६) सकाळी मृत्यु झाला. गँग मधीलच मित्रानी “तु मला बोलत का नाहीस, या किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केली होती.
आकाश उर्फ “अवकाळ्या हा सराईत गुन्हेगार होता. उमरग्यातील आकाशसह चौघे २१ मार्चच्या रात्री बारापर्यंत एकत्र होते. २२ तारखेच्या पहाटे तु मला बोलत का नाहीस, या किरकोळ कारणावरून त्यांच्यात भांडण सुरू झाले. यातील तिघांनी आकाश बाळू जगताप उर्फ ‘अवकाळ्या’ याला विटा, फडशीने डोक्यात, अंगावर गंभीर मारहाण केल्याने तो बेशुद्ध अवस्थेत पडला.त्याला येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, आकाशची अवस्था गंभीर असल्याने
त्याच्यावर लातूरच्या शासकिय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. रविवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सांगण्यात आली.
सुरवातीला गंभीर मारहाण झाल्यानंतर आकाशच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी रात्री श्रीनिवास पाटील, दादा करवते रा. शास्त्रीनगर उमरगा, रसुल शेख रा. काळे प्लॉट उमरगा यांच्याविरुद्ध जिवे माराण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान आकाश उर्फ अवकाळ्या याच्यावर गंभीर मारहाणीचे गुन्हे दाखल होते. पोलिस व उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये तो कांही महिने तडिपार होता.काही महिन्यापूर्वी एका तरुणाला गंभीर मारहाण प्रकरणी तो तुरुंगात होता, आठ दिवसापूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता.विशेष म्हणजे मारहाण करणारे व मृत्यू झालेला आकाश हा उमरगा शहरात गेल्या अनेक वर्षापासून गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य करीत होता. . यांची एक गँगच होती. देवाणघेवाण वरून यांच्यात भांडण झाली असावीत अन त्यातूनच भांडण होऊन हाणामारी झाली असावी अशी चर्चा उमरगा शहरात दिसून येत आहे