विधानपरिषदेच्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून मोठा गदारोळ निर्माण झालं होता. तसेच काँग्रेसने यावरून थेट तांबे पिता-पुत्रावर कारवाई सुद्धा केली होती. त्यातच आता राज्यात सुरु असलेल्या गोंधळावरुनकाँग्रेस नेतेबाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. या राजीनाम्यानंतर बाळासाहेब थोरातांच्या मनामध्ये काय सुरु आहे असा प्रश्न राजकीय वर्तुळात बोलून दाखवला जात आहे.
काँग्रेस पक्षात मागील काही दिवसांपासून अंतरगड वाद निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये सुरु असलेली गटबाजी समोर आली होती. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आता विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात आले आहे. आता या प्रकरणी काँग्रेस हायकमांड कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागल्याचे सांगण्यात येत असून याला कारणीभूत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असल्याची चर्चा दबक्या आवाजामध्ये सुरु आहे.
आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस आहे, आणि आजच्याच दिवशी त्यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे, बाळासाहेब थोरात यांनी असा कोणताही राजीनामा दिल्याची माहिती आम्हाला मिळालेली नाही. त्यांनी राजीनामा दिला नसल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली.मला त्यांनी दिलेल पत्र दाखवा. बाळासाहेब थोरात यांची तब्येत चांगली नाही त्यामुळे ते कोणाशी बोलत नाहीत. हे काँग्रेस विरोधात राजकारण सुरू आहे, राज्यात काँग्रेसला यश मिळत आहे, असंही नाना पटोले म्हणाले.