१० दिवस शिवसेनेच्या अनेक आमदारांसह ‘बंडखोर’ झालेले शिंदे यांनी आता भाजपसोबत जात ही राजकीय लढाई जिंकली आहे. महाराष्ट्राचा हा राजकीय खेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिंकल्याचे मानले जात आहे. यानंतर शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडला.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी राज्यात घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अनेक विषयांवर भाष्य केलं. मेट्रो कारशेडचा मुद्दा देखील त्यांनी मांडला. मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरून परत एकदा राजकारण चर्चेत येणार आहे. त्यामुळे माझा राग मुंबईवर काढू नका असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. या संदर्भात आता भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
“उद्धव ठाकरे यांना बनवाबनवी करण्यात नोबेल पुरस्कार मिळू शकतो” असा टोला त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. येत्या सहा ते सात महिन्यात कारशेड प्रकल्पाचे काम पूर्ण होऊ शकतं. त्यामुळे वर्षभरात मुंबईत मेट्रो देखील धावायला सुरुवात होईल आणि यामुळे मुंबईच्या लोकल वरील बराच भार कमी होणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी यावेळी सांगितलं.
उद्धव ठाकरे यांनी केवळ आरे कारशेडचं काम बंद पाडलं नाही. तर त्यामुळे बाकीची काम देखील ठप्प झाली. त्या काळात मेट्रोचे डबे बनवणाऱ्या कंपन्यांनी करार देखील रद्द केले. तर कर्ज वितरित करणाऱ्या संस्थांनी देखील हात आखडता घेतला. पण महाराष्ट्रात आता एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचा सरकार आलं आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामांना गती मिळणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.