शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालेगाव येथील जाहीर सभेत शिंदे गट आणि भाजपवर हल्ला चढवला. उद्धव ठाकरेंच्या टीकेला भारतीय जनता पक्षाने जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. मागच्या आठ महिन्यांपासून उद्धव ठाकरेंनी टीका करण्याशिवाय दुसरं काहीही केलेलं मला पाहायला मिळालेलं नाही, असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी पलटवार केलाय.दरम्यान, उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचाही उल्लेख केला होता. आता, त्यावरुन, हर्षवर्धन पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय.
उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या सभेत भाजप ही भ्रष्टाचारी पार्टी असल्याचं आरोप केला. त्यांच्याकडे इतर पक्षातील आमदार-खासदार गेले की ते गुजरातच्या निरमा पावडरने धुवून काढतात. काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर सभेत सांगितलं होतं, आता चांगली झोप लागतीय, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी हर्षवर्धन पाटील यांना जोरदार टोला लगावला होता. आता, उद्धव ठाकरेंच्या या टिकेनंतर हर्षवर्धन पाटील यांनी पलटवार केलाय. वैफल्यग्रस्त झाल्याने उद्धव ठाकरे अशी टीका करत असल्याचं ते म्हणाले.
मी जे विधान केलं होतं, त्यामागची पार्श्वभूमी उद्धव ठाकरेंनी अगोदर समजून घ्यावी. कारण, मी तेव्हा केलेलं विधान हे वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये होतं. गेल्या ३५ वर्षांच्या राजकारणात माझ्यावर कुठल्याही प्रकारची चौकशी नाही किंवा कुठलाही आरोप नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपावर माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. तसेच, वैफल्यग्रस्त भावनेतून हे बिनबुडाचे आरोप होत असल्याचेही पाटील यांनी म्हटले.