मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याची अंमलबजावणी करणारा अध्यादेश महाविकास आघाडी सरकारने अखेर आज तडकाफडकी रद्द केला. या अध्यादेशावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे पणन संचालकांचा विरोध मोडून काढण्यासाठी काही तासांतच आमदारांच्या अपीलावर सुनावणी घेऊन हा अध्यादेश रद्द करण्यात आला आहे.
मोदी सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांवरून देशभरातील शेतकऱ्यांत संतापाची लाट आहे. मोदी सरकारचे हे तिन्ही कायदे महाराष्ट्रात लागू केले जाणार नाहीत, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली खरी, परंतु मोदी सरकारच्या या तीनपैकी एका कायद्याची (कृषी पणन) अंमलबजावणी करणारा अध्यादेशच ऑगस्ट महिन्यातच पणन संचालकांनी काढल्याचे उघडकीस आल्यामुळे महाविकास आघाडीची चांगलीच पंचाईत झाली होती.