अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला होता. आजही त्याच्या चाहत्यांना आणि मित्र- परिवारालाही त्याची उणीव भासत आहे. सुशांतचे अचानक जाणे त्याच्या चाहत्यांसाठी कोणत्याही धक्क्यापेक्षा कमी नव्हते. आतापर्यंतच्या तपासात अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचेच समोर आले आहे. मात्र त्याची हत्या झाल्याचं चाहते आणि कुटुंबिय वारंवार सांगत आहेत. मात्र, या प्रकरणात अद्याप काहीही सिद्ध झालेले नाही.
दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या एका मुलाखतीमुळे आता नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत. सुशांतच्या मृत्यूचं प्रकरण इतकं पेटलं की योग्य तपासासाठी ते केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात आले. मात्र, आतापर्यंत सीबीआयने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केलेले नाही. आता एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी अनेक नवे खुलासे केले आहेत.
मुलाखतीत त्यांनी सांगितले की, ‘पूर्वी उपलब्ध माहिती ही केवळ अफवांवर आधारित होती, त्यानंतर काही लोकांनी दावा केला की त्यांच्याकडे या प्रकरणासंबंधीचे पुरेसे पुरावे आहेत. त्यानंतर या लोकांशी संपर्क साधून पुरावे पोलिसांकडे देण्यास सांगण्यात आले. सध्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या पुराव्यांची विश्वासार्हता पडताळण्याचे काम सुरू असून अद्याप तपास सुरू असल्याचेही फडणवीस म्हणाले. त्यामुळे खटल्याच्या निकालावर भाष्य करणे त्यांच्यासाठी खूप घाईचे आहे असे विधान त्यांनी केले होते.