बकरी ईदच्या निमित्ताने मिरा रोडमध्ये एका सोसायटीत दोन बकरे आणण्यात आले होते. सोसायटीच्या लोकांना कुर्बानीसाठी बकरी आणण्यात आल्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यादरम्यान, काही लोकांनी हनुमान चालिसाचं वाचन केलं, तर काहींनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता, आंदोलकांनी त्यांच्याशी वाद घातला. पण पोलिसांनी त्यांची समजूत काढत शांत केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहसीन शेख नावाच्या एका व्यक्तीने कुर्बानीसाठी दोन बकरे आणले होते. यावेळी सोसायटीतील लोकांना याची माहिती मिळाली असता ते खाली उतरले आणि आंदोलन करण्यास सुरुवात केली. विरोध करणाऱ्या लोकांनी हनुमान चालिसाचं पठण सुरु केलं, तसंच जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं.
यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी सोसायटीमधील लोकांना सांगितलं की, नियमानुसार सोसायटीत कुर्बानी दिली जाऊ शकत नाही. आम्ही तसं होऊदेखील देणार नाही. जर असं करण्यात आलं तर आम्ही गुन्हा दाखल करु आणि अटकेची कारवाई करु. पण घरात बकरा आणू शकत नाही असा कोणताही नियम नाही. पण लोकांच्या भावना पाहता आम्ही येथून बकरा घेऊन जावा असंच सांगू.
सोसायटीत बकरा घेऊन जाणार्या मोहसिनने सांगितलं आहे की, या सोसायटीत 200 ते 250 मुस्लीम कुटुंब राहतात. प्रत्येक वर्षा आम्हाला बिल्डर बकरे ठेवण्यासाठी जागा देतो. पण यावेळी जागा नसल्याचं बिल्डरने सांगितलं. त्याने सोसायटीशी बोलण्यास सांगितलं होतं. पण सोसायटीकडे जागा मागण्यात आली असता त्यांनी बकरे ठेवण्यासाठी जागा दिली नाही. तसेच आपण सोसायटीत कधीच कुर्बानी देत नाही असं मोहसीनचं म्हणणं आहे.