मुंबई | केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह तात्पुरते गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून शिंदे गटासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अग्रलेखातून भाजप, शिंदे गट, एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यावर टीकास्त्र सोडले .मिंधे गटाचा मुखवटा म्हणजे विचार नाही. मुखवटय़ामागे भ्रष्ट, बेइमान गेंडय़ाची कातडी आहे.
महाराष्ट्रीय जनतेने खोक्यांच्या चिता पेटविल्या की गेंड्याची कातडीही जळून जाईल . छे छे ! यांना जाळायचे कसे ? ही तर अफझल खान , औरंग्याच्या विचारांची अवलाद. महाराष्ट्राच्या दुष्मनांचे दफन करायला हवे . त्यांच्या थडग्यांवर फक्त एवढेच लिहायचे, ‘ येथे महाराष्ट्राच्या गद्दारांना स्वाभिमानी मराठी जनतेने कायमचे गाडले आहे !’ त्या थडग्यावर तुमची नातवंडेही थुंकतील ! हे राज्य श्रींचे आहे . शिवरायांचे आहे . शिवसेना शिवरायांचा अंश आहे. तो अंश तुम्ही कसा मिटवणार ? अशा शब्दात शिंदे गटाला उद्धव ठाकरेंनी धारेवर धरले.
शिवसेना ही काही तुमच्या खोकेवाल्यांसारखी विकाऊ संघटना नाही. स्वाभिमानाच्या मजबूत पायावर ती 56 वर्षांपासून न डगमगता उभी आहे. अनेक वादळे आणि घाव झेलून तिने झंझावात कायम ठेवला आहे. शिवसेना संपवू अशी स्वप्ने पाहणाऱ्यांच्या गोवऱ्या सोनापुरात रचून शिवसेनेने अनेक अग्निपरीक्षा पार केल्या आहेत. ज्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण गोठवण्याचा नीचपणा केला, त्यांचा राजकीय अंत शिवसेनेच्या बाणानेच होणार आहे. असे अनेक शिंदे व मिंधे येत-जात असतात. गद्दारांना इतिहासात कधीच स्थान नसते. पोवाडे मर्दांचे व स्वाभिमान्यांचे गायले जातात. खोकेबाज मिंध्यांवर लोक थुंकतात,अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.