लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच राजकीय वर्तुळात हालचालींना सुरुवात झाली आहे.या निवडणुकीसाठी राष्ट्र्रवादी काँग्रेसनेही कंबर कसली आहे. यंदा शिरूर लोकसभा मतदारसंघातून पक्षाकडून खासदार अमोल कोल्हे यांचा पत्ता कट होणार अशी माहिती समोर येत आहे. या मतदारसंघातून विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे.
तर दुसरीकडे आंबेगाव तालुक्याचे गेल्या अनेक वर्षांपासून नेतृत्व करणारे आमदार दिलीप वळसे पाटील यांनीही आपली मुलगी पूर्वा वळसे पाटील हिला आमदारकीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी दर्शविली आहे. पण शिरूर मतदारसंघातून पार्थ पवार यांना तिकीट मिळाले, तर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे काय होणार, हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने डॉ. अमोल कोल्हे यांना मोठी जबाबदारी देण्याबाबत ठरविल्याची माहिती समोर येत आहे.
मात्र कोल्हे यांना पक्षाने तिकीट न दिल्यास ते राष्ट्रवादीला रामराम ठोकू शकतात, अशी चर्चाही समोर येत आहे. तसेच ते शिंदे गटात जातील असेही बोलले जात आहे. पण, शिंदे गट त्यांना तिकीट देईल का, याबद्दलदेखील साशंकता आहे. त्यामुळे आगामी काळात अमोल कोल्हे यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.