माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एका प्रसिद्ध माध्यमाच्या कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी संजय राऊत यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना आपल्या शैलीमध्ये रोखठोक उत्तरे दिली. यावेळी त्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या वादावरच्या प्रश्नांवरही रोखठोक उत्तरे दिली. आम्ही असे सांगत आहोत की, निवडणूक आयोगापुढे आम्ही आमची बाजू भक्कम पुराव्यासह मांडलेली आहे. दहाव्या शेड्यूलनुसार ४० आमदारांनी पक्षाविरोधी, पक्षाचा व्हिप झुगारुन मतदान केले आहे. आतापर्यंत अरुणाचल प्रदेश आणि अन्य ठिकाणी असे निकाल लागले आहेत, असे म्हणत राऊत यांनी न्यायालयाच्या निकालानंतर सरकार जाणार, असा दावा केला
जोपर्यंत ते अन्याय करत नाहीत तोपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगावर विश्वास ठेवायला हवा. एक स्वतंत्र स्वायत्त ती संस्था आहे. न्यायालय, संसद आणि निवडणूक आयोग या स्वायत्त संस्था घटनेने निर्माण केलेल्या आहेत. त्याला राजकीय रंग लागू नये, असं आपलं म्हणणं असतं. पण गेल्या काही वर्षांत अनेक संस्थांना तो राजकीय रंग लागल्याचं आपल्याला बघायला मिळालं आहे. न्यायालयाला सुद्धा विकत घेण्याचा प्रयत्न होतोय. आम्ही संपूर्ण सत्य मांडल्यानंतर आमच्या अपेक्षा आहेत की, या स्वायत्त संस्थांनी न्याय करावा. आम्ही न्यायाची अपेक्षा करतोय. जोपर्यंत आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे तोपर्यंत अपेक्षा ठेवू. निकाल लागल्यावर आम्ही आमचं मत मांडू, अशी भूमिका राऊतांनी मांडली.
आताचे सरकार न्यायप्रिय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्य, न्याय, कायदा याबाबत जास्त आस्था आहे. त्यामुळे न्याय होईल, असं आम्हाला वाटतं. एकतर सर्व बंडखोर आमदार अपात्र ठरले पाहिजेत. पक्ष फुटला आहे. जे फुटून गेलेले आहेत ते पक्ष आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकत नाही. पक्ष मूळ हा आपल्या जागेवरच असतो, असे राऊत म्हणाले.आमदार-खासदार बाहेर पडले म्हणजे पक्ष फुटत नाही. ते पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना जो अधिकार होता त्या अधिकाराने त्यांना तिकीट देण्यात आले. त्या तिकिटावर ते निवडून आले. त्यामुळे त्यांचा निकाल आधी लागेल. मग आमचं कायल होईल ते होईल, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.