राज्यात पार पडलेल्या ग्रामपंचायतींवर कुणाचा झेंडा फडकणार याचा निर्णय आज लागणार आहे. एकूण १८ जिल्ह्यातील ११६६ ग्रामपंचायतींपैकी ८७ जागा बिनविरोध निवडून आल्यात.त्यामुळे १ हजार ७९ जागांसाठी रविवारी मतदान पार पडलं. याच निवडणुकांचा निकाल लागण्यास सुरुवात झाली असून भाजप-शिंदेगट आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे वर्चस्व पणाला लागले आहे. अशातच शिंदे गटाचे नेते आमदार भरत गोगवाले यांना ग्रामस्थांनी धक्का दिला आहे.
भरत गोगावले यांच्या रायगड जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावची म्हणजेच काळीज खरवली ग्रामपंचायत आघाडीकडे गेली आहे. येथे शिंदे गटाच्या सरपंचपदाच्या उमदेवाराचा पराभव झाला. काँग्रेस समर्थक चैतन्य महामुनकर हे विजयी झाले आहेत. त्यामुळे, शिंदे गटाला हा धक्का मानला जातो.
भरत गोगवले हे सध्या शिंदे गटातील आघाडीचे नेते असून विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे प्रतोदही आहेत. शिवसेनेतील दोन गटातील चिन्ह आणि नावाच्या संघर्षानंतर होत असलेल्या या निवडणुकांच्या निकालाकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. खरवली काळीज ग्रामपंचायतीत एकूण १३ सदस्य १ सरपंच एकूण १४ उमेदवार विजयी झाले आहेत. सरपंच पदासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार चैतन्य उर्फ बाबू महामुनकर विजय झाले.
बाळासाहेबांची शिवसेना उमेदवार समीर महामुनकर यांना १०५३ तर महाविकास आघाडीचे विजय उमेदवार बाबू , महामुनकर यांना ११७६ मते मिळाली. यामध्ये शिवसेनेचे १० सदस्य महाविकास आघाडीचे २ सदस्य तर १ अपक्ष सदस्य निवडून आला आहे. शिंदे गटाचे १० सदस्य निवडून आले, पण सत्ता महाविकास आघाडीकडे गेली. कारण, जनतेतून सरपंच निवड असल्याने शिंदे गटाला हा फटका बसला आहे.