खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाच्या शैलीवर सडकून टीका करत जोरदार टोला लगावला होता. शिंदे यांचे भाषण ऐकले तर ते एखादे गल्लीतले भाषण वाटते. विधानसभेतील संबोधन हे मुख्यमंत्र्यांचे वैयक्तिक भाषण नाही. मुख्यमंत्र्यांना एक संधी मिळते महाराष्ट्राच्या विकासवरती बोलण्यासाठी. तसेच, जनतेच्या प्रश्नांवर बोलण्याचीही त्यांना संधी मिळते; परंतु मुख्यमंत्रीच जर वैयक्तिक मुद्द्यांवर भाषण द्यायला लागले तर राज्याच्या विकासावर कोण बोलणार? असा प्रश्न राऊतांनी केला.
रस्त्यावरची भाषा असली तर आम्हीही रस्त्यावरती उत्तर देऊ. आपण विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून बोलताय, मंत्री म्हणून बोलताय भान ठेवून बोलले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले आहेत. त्यांच्या या टीकेवरून आता सत्ताधारी पक्षाकडून त्यांना लक्ष्य केले जात आहे. अशातच आता भारतीय जनता पक्षाकडून संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी संजय राऊत यांच्यावर कडक शब्दात टीका केली.
माध्यमांशी बोलताना कराड म्हणाले, संजय राऊत यांचे बोलणे म्हणजे निव्वळ बडबड आहे. संजय राऊत म्हणजे विटलेली भाजी आणि कडी आहेत. भाजी विटली की ती टाकूनच द्यावी लागते. तसेच राऊतांचे झाले आहे. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्यांच्या बोलण्यात काही तथ्य नसते. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला जास्ती गंभीरपणे घेण्याची गरज नाही असं म्हणत जोरदार टोला लगावला होता.