अजितदादा म्हणतायत संभाजीराजे धर्मवीर नव्हते, त्यांच्या या विधानावर छत्रपती संभाजी राजे यांची पहिली प्रतिक्रिया
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी जे विधान केलं, त्यावरून नवा वाद निर्माण झाला होता आता यावर माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, अजित पवार काय म्हणाले त्याबाबत कोणता संदर्भ दिला मला माहीत नाही. पण अजितदादा बोलले ते अर्धसत्य आहे. संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होतेच. पण ते धर्मवीरही होते. त्याबाबतचे अनेक पुरावे अस्तित्वात आहेत, असं छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलं. संभाजी छत्रपती पत्रकार परिषदेत बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ताराराणीसाहेब यांनी या हिंदवी स्वराज्याचं संरक्षण केलं. त्याबद्दल दुमत नाही. संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते हे निश्चित आहे. तसेच संभाजी महाराजांनी धर्माचंही रक्षण केलं हे कोणीही नाकारू शकत नाही म्हणून संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक तर आहेतच, त्यापाठोपाठ ते धर्मरक्षकही आहेत. हे म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. त्यामुळे तुम्ही इतिहासाची मोडतोड करू नका, असं संभाजी छत्रपती यांनी सांगितलं.
संभाजी महाराज धर्मवीर होते. त्याबाबतचे अनेक पुरावे आहेत. संभाजी महाराज हे स्वराज्यवीर आहेत. धर्माचे रक्षक आहेत. धर्मवीर असल्याचे हे पुरावे आहेत. अजित पवारांनी कोणता संदर्भ देऊन ते विधान केलं. ते त्यांनीच सांगावं. कोणत्याही ऐतिहासिक घटनेवर भाष्य करताना त्यावर अभ्यास केल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नका, अशी माझी सर्व पुढाऱ्यांना विनंती राहील, असंही त्यांनी सांगितलं.