पंढरपूर – महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षातील आमदारांना मतदारसंघासाठी निधी मिळत नाही, यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी आहे. तीनही पक्षातील आमदार मोठ्या संख्येने भाजपशी संपर्क साधत असून एक मोठा पक्षच फुटलेला दिसेल, असा दावा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
कोरोनाच्या संकटापुढे आघाडी सरकार क्वॉरन्टाईन झाले असून नागरिकांना उपचारासाठी बेड मिळत नाहीत ना टेस्टिंग केले जात. महाविकास आघाडीतील भाजपसोबत येण्यासाठी अनेक लॉक चाचपणी करत आहेत. येत्या काळामध्ये आमच्याकडे येणारा गत हा बहुमताचा असेल, असा दावाही खोत यांनी केला आहे.
दरम्यान, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी खोत यांना प्रत्युत्तर दिले आहे. माजी मुख्यमंत्री बाहेरून आलेल्या लोकांना सोबत घेऊन फिरतात, यांचा पक्ष कमजोर आणि दुर्बल झालेला आहे. भाजपच्या १०५ मधील त्यांच्याकडे गेलेले आमचे लोक कधी माघारी येतील हे त्यांना कळणार नाही, आमच्या संपर्कात असणाऱ्या लोकांची नाव बाहेर आल्यास मोठा भूकंप होईल, असं ठाकूर म्हणाल्या आहेत.