कोल्हापूर | कोल्हापूरसह रत्नागिरीत मागच्या दिन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरु आहे अशातच सलग दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील रस्ता खचल्याने या महामार्गावरील वाहतुकीवर गुरुवार रात्रीपासून माेठा परिणाम झाला आहे. आज सकाळपासून या महामार्गावरील वाहतुक धिम्या गतीने सुरु असून पर्यायी मार्गच अवलंब करण्याचे आदेश वाहतूक विभागाकडून देण्यात आले आहे.
रत्नागिरी आणि काेल्हापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरुच आहे. पावसामुळे रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे. पहिल्याच पावसाचा फटका रत्नागिरी काेल्हापूर महामार्गावरील रस्त्यालादेखील बसला आहे. या महामार्गावर बहुतांश ठिकाणी छाेटे माेठे खड्डे पडले आहेत. यामुळे महामार्गावरुन प्रवास करणा-यांचे हाल होताना दिसून येत आहे.
रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील नाणीज जवळ गुरुवारी रात्रीच्या सुमारास रस्ता खचला. सध्या मिऱ्या ते नागपूर जाणाऱ्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आहे सुरु. रात्री साडेबारा वाजल्यापासून कोल्हापूरकडे आणि रत्नागिरीकडे येणारी वाहतुक ठप्प झाली होती. खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी ठेकेदाराकडून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली. दरम्यान यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.