मुंबई: राज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने एकत्र येत स्थापन केलेले महाविकास आघाडी सरकार फार काल टिकणार नाही, अशी टीका कायम विरोधी पक्षाकडून केला जातो. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील तीन पक्षांचं सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही, कारण ह्या तिन्ही पक्षांमध्ये कोणताही संवाद दिसत नाहीये ताळमेळ जाणवत नाहीये, असा दावा केला आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या एका कार्यकमात ते बोलत होते.
राज्यातील तीन पक्षांचं सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही कारण ह्या तिन्ही पक्षांमध्ये कोणताही संवाद दिसत नाहीये ताळमेळ जाणवत नाहीये #माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन#RajThackeray
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 31, 2020
कोरोनाचं संकट अभूतपूर्व आहे पण त्या काळात सरकारवर टीका करण्याची वेळ नव्हती. दोन्ही सरकारच्या चुका झाल्या पण ती वेळ राजकारण करण्याची नव्हती म्हणून विरोधी पक्षांनी जबाबदारीने वागायला हवं होतं. भविष्यात ह्यावर बोलूच. कोरोनाच्या काळात खाजगी रुग्णालयांनी रुग्णांची वारेमाप लूट केली पण त्यांच्यावर सरकार चाप लावू शकला नाही. खाजगी रुग्णालयांना सरकारकडून सवलती मिळतात तरी रुग्णांना ते नाकारू कशी शकतात? असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी केला.
अर्थव्यवस्था आज जवळपास ठप्प झाली आहे, लोकांच्या नोकऱ्या जात आहेत त्यामुळे आता ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकार नक्की काय करणार आहे ह्या विषयी सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. कोरोनाबाबत लोकांच्या मनात कमालीची भीती निर्माण झाली आहे, माध्यमांनी देखील ही भीती वाढवली. कोरोनाचा संसर्ग गंभीर आहे पण त्याचा बाऊ खूप केला गेला. आणि मोठ्या घरांचं ठीक आहे पण झोपड्यांमध्ये कुठून क्वारंटाईन होणार होते?, असा सवाल देखील यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.