एकनाथ शिंदे गटात आणि शिवसेना यांच्यातील दरी वाढवण्याचे काम संजय राऊतांनी केल्याचा आरोप दीपक केसरकर यांच्यासह सोशल मिडियावर होत असतानाच सोमवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना राऊंच्या बोलण्यात नरमाईची भूमिका पाहवयास मिळाली. मागच्या दोन दिवसांपासून बंडखोरांवर घणाघाती टिका करणारे राऊत आज काहीसे मवाळ झाले होते. त्यामुळे परत या, आजही चर्चा करायला आम्ही तयार आहोत असे आवाहन त्यांनी बंडखोर आमदारांना केले आहे.
शिवसेना पक्ष आणि शिंदे गटात केवळ संजय राऊत यांच्या प्रतिक्रीयांमुळे अधिक मतभेद वाढत आहेत. अशा प्रतिक्रिया देणारा नेता कुण्या पक्षाला मिळू नये असे दीपक केसरकर यांनी सुनावले होते. एवढेच नाहीतर सोशल मिडियामध्येही संजय राऊत यांच्या आक्रमक भूमिकेमुळेच हे मतभेद वाढत असल्याचा सूर उमटत होता. कदाचित त्यामुळेच सोमवारी सकाळी संजय राऊतांनी बंडखोर आमदारांबद्दल मवाळ भूमिका आणि भाजपवर टिकास्त्र कायम ठेवले. त्यामुळे भविष्यात शिंदे गट काय निर्णय घेतो हेच पहावे लागणार आहे.
बंडखोर आमदारांच्या मागे कोण आहे हे आता वेगळ्याने सांगायची गरज नाही. पण शिवसेनेत आत्मसन्मान आहे. भाजपामध्ये मात्र, गुलामगिरी पत्करल्याशिवाय सुरक्षा ही मिळणार नाही. त्यामुळे आजही चर्चेसाठी दारे खुली आहेत. स्वाभिमानाने या आणि खुली चर्चा करा अशी साद संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना त्यांनी घातली आहे. यावर आता शिंदे गटाकडून काऊ प्रतिक्रिया येते हे पाहावे लागणार आहे.