विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज विविध कामांचा आढावा घेण्यासाठी बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी विविध मुद्यांवर संवाद साधला. त्यांनी महिला मुख्यमंत्री, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचे निर्माण झालेला वाद आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न या मुद्यांवर भाष्य केले. महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री देणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. याबाबत अजित पवार यांना विचारले त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
पवार म्हणाले की, १४५ आमदारांचा आकडा जो मिळवू शकतो तो कुणालाही मुख्यमंत्री करू शकतो. उद्या कोणाच्या मनात कुठला विचार यावा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. उद्धव ठाकरे यांच्या मनात तसे आले असेल म्हणून त्यांनी त्याबाबतची घोषणा केली असेल. उद्या जो पक्ष १४५ आकडा मिळवू शकेल तो महिला किंवा पुरुष कोणालाही मुख्यमंत्री बनवू शकतो, असे पवार यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात सुरू असलेल्या वादावर देखील अजित पवार यांनी भूमिका मांडली. सध्या या प्रश्नावर न्यायालयीन लढाई लढण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्म्ई यांनी प्रख्यात विधीज्ञ रोहतगी यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. महाराष्ट्र राज्याच्या वतीने आपली बाजू मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रख्यात विधीज्ञ हरीश साळवे यांच्याकडे हे प्रकरण द्यावे. पूर्वी आघाडी सरकारच्या काळात हे प्रकरण चालू असताना विलासराव देशमुख यांनी साळवे यांच्याकडेच जबाबदारी दिली होती. साळवे हे नागपूरचे पुत्र असून त्यांना या प्रश्नांची चांगली जाण आहे, असेही पवार म्हणाले.