एकनाथ शिंदेंनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह बंडखोरी केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवले आहे. त्याचाच फायदा घेत उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या दक्षिण मुंबई जिंकण्यासाठी भाजपने (BJP) कंबर कसली आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवरमोठी जबाबदारी दिल्याची माहिती पुढे आली आहे.
याबाबत माध्यमांनी खासदार विनायक राऊत यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, ज्यांनी ही जबाबदारी राणेंवर सोपवली त्यांचे मी आभार मारतो. नारायण राणे आणि पनवती हे समीकरण ठरलेले असून, याची प्रचिती मुंबई आणि सिंधुदुर्गमध्ये दिसून आली. त्यामुळे जबाबदारी अशीच चालू ठेवा.
महापालिकेबाबत बोलताना राऊत म्हणाले, न्यायालयाने फटकारल्यानंतर पालिका प्रशासनाला सुबुद्धी आली. प्रशासन सत्ताधाऱ्यांचे मोहरे म्हणून काम करत असेल, तर योग्य ती जाणीव त्यांना करून देण्याची जबाबदारी मुंबईकरांवर आली आहे. प्रत्येक गोष्टीला मुंबई उच्च न्यायालय हाच मार्ग असेल तर, पालिका प्रशासन बरखास्त करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
विनायक राऊतांवर ठाण्यानंतर गडचिरोली आणि गोंदिया येथे गुन्हा दाखल झाला आहे. त्यावर राऊत म्हणाले, नारायण राणेंचा नंगा नाच चालतो. उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख, शिवीगाळ करण्यात येते. दादर, हिंगोली आणि संभाजीनगरमध्ये शिंदे गटाच्या आमदारांनी हौदोस घातलेला चालतो. शिवसेनेच्या एका नेत्याने शिंदे गटावर टीका-टिप्पणी केली तर, १५३ च्या नोटिसा बजावल्या.