मुंबईसह, उपनगर आणि कोकणात पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. यामुळं काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला. मुंबई आणि कोकणासोबतच कोल्हापूर जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली.
जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत अल्प पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरु झाल्यानं शेतकरी आनंदी झाले आहेत. दरम्यान, राज्याच्या अन्य भागातही पावसाची प्रतिक्षा कायम आहे.
राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
एनडीआरएफच्या टीम रत्नागिरी, रायगडमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने याबाबत अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील सांगण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात 6 आणि 7 जुलै रोजी मुसळधारेचा अंदाज आहे. कोकण आणि गोव्यात देखील पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. कोकणाला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.