मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांच्याच विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. यानंतर आता अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे जर पंतप्रधान झाले, तर चांगलं आहे. मराठी माणसाला पंतप्रधान पद मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे.आता नवं चिन्ह मिळवण्यासाठी ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाकडून जोरबैठका सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व मंत्री आणि नेत्यांना वर्षा बंगल्यावर बैठकीसाठी बोलावले होते. या बैठकीला अब्दुल सत्तारही हजर होते. याबद्दल बोलताना ते म्हणाले, की दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील की कोणत्या चिन्हची मागणी निवडणूक आयोगाकडे करायची.
अब्दुल सत्तार यांनी असा दावाही केला की आमच्याकडे कार्यकर्त्यांची ताकत जास्त आहे. यामुळे आमचा विजय आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाचा निवडणूक चिन्हाबद्दलचा हा निकाल अंधेरी पोटनिवडणुकीकरीता असल्याने त्यानंतर ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह आपल्यालाच मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनीही या बैठकीत व्यक्त केला होता.
अब्दुल सत्तारांकडून शिवीगाळ – याच बैठकीमध्ये कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला होता. बैठकीतच अब्दुल सत्तार यांनी आपलं काम केलं नसल्याचा राग ठेवत OSD यांना शिवीगाळ केली.