मुंबई | ‘शासन आपल्या दारी’ या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी लोकांना धमकीवजा संदेश पाठवले जात असल्याच प्रकरण समोर आलं यावरून आता राज्य सरकारवर जोरदार टीका होताना दिसून येत आहे अशातच आता या संदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुख्यमंत्री महोदय हे काय सुरू आहे? असा संतप्त सवाल करतानाच महाराष्ट्राने अशी हुकूमशाही कधीच पाहिली नाही. अशा हुकूमशाहीला महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे दिला आहे. सध्या या ट्विटची आता जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असून इतर पक्षांकडून सुद्धा याच मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका होत आहे.
शासन आपल्या दारी या मोहिमेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगावात असणार असून या कार्यक्रमासाठी अधिकाधिक गर्दी जमवावी या हेतूने शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे. रेशनकार्डधारकांनी सभेला उपस्थित राहणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांचे रेशनकार्ड रद्द करून पुढील चार महिने धान्य पुरवले जाणार नाही, असा संदेश पसरवण्यात येत आहे. जनतेला कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सरकारच्या या धमकीवर जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे.
दरम्यान, ‘तुम्हाला मोफत धान्य मिळते आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे. त्यामुळे त्यांच्या सभेला येणे सर्व रेशनकार्डधारकांना बंधनकारक आहे. जे हजर राहणार नाहीत त्यांचे रेशनकार्ड रद्द करून धान्यही पुढच्या तीन ते चार महिन्यांसाठी बंद करण्यात येईल, असा सरकारचा नियम आहे,’ असे संदेश जळगाव जिल्ह्यातील रेशन दुकानदारांकडून सर्व रेशनकार्डधारकांना पाठवण्यात आले आहेत अशी माहिती समोर येत असून यावर आता प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहे.