पुणे | मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते रविंद्र महाजनी यांचे निधन झाले आहे. पुण्यात एका बंद खोलीत शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळला. ८० च्या दशकात मराठी चित्रपट सृष्टीतील हँडसम हंक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली होती. तसेच महाजनी यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले.
‘मुंबईचा फौजदार’, ‘झुंज’, ‘कळत नकळत’, ‘आराम हराम’ आदी चित्रपटांतील त्यांची भूमिका तर सुपरहिट ठरली. मात्र, या अभिनेत्याच्या करिअरची सुरुवात टॅक्सी चालवण्यापासून झाली होती. रविंद्र महाजनी हे एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. अभिनय क्षेत्रात पाय ठेवण्यापूर्वी ते टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत. त्यांनी साधारणपणे 3 वर्षे मुंबईत टॅक्सी चालवली.
मात्र, त्यांच्यातील एक कलाकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. ते दिवसा वेगवगेळ्या ठिकाणी जाऊन निर्मात्यांच्या भेटी घेत आणि रात्री टॅक्सी चालवत. मात्र ते टॅक्सी चालवतात, असे समजल्यानंतर, त्यांच्या अनेक नातलगांनी त्यांच्याशी असलेला संपर्क कमी केला होता. पण ते जेव्हा एक अभिनेता म्हणून नावारुपाला आले, तेव्हा त्यांचे हेच नातलग पुन्हा त्यांच्या जवळ आले.
रविंद्र महाजनी यांनी मराठीसह हिंदी आणि गुजराती सिनेमांमध्येही काम केले. रविंद्र महाजनी यांनी व्ही. शांताराम यांच्या झुंज या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केले होते. यानंतर त्यांनी ‘लक्ष्मी’, ‘दुनिया करी सलाम’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’ यांसारखे प्रसिद्ध चित्रपट दिले.