सध्या राज्यातच्या राजकारणात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे भूकंप आला असून क्षणाक्षणाला खळबळजनक माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या काही आमदारांनी बंडखोरी केल्यानं इतर पक्ष देखील सावध झाले आहेत. अशातअपक्ष आमदार देवेंद्र भुयार रोज काही ना काही वक्तव्य करुन चर्चेत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनी आता नवं वक्तव्य केलं आहे.
माझ्या मनातील मुख्यमंत्री अजित पवार आहेत. ते मुख्यमंत्री झाले तर तो सर्वात आनंदाचा क्षण असेल, असं भुयार यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे सक्षम आहेत. पण वेळेची आणि भेटीची अडचण आहे, त्यांनी आम्हला वेळ द्यावा हीच मागणी आहे. तसेच एकनाथ शिंदे हे नॉट रीचेबल आहेत. त्याबद्दल आम्ही वस्तुस्थिती तपासू. मात्र शिंदे साहेब हे आनंद दिघे यांचे शिष्य आहेत. गद्दारी त्यांच्या रक्तात नाही. ते काही चुकीचा निर्णय घेतील असं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया आमदार देवेंद्र भुयार यांनी एबीपी माझाशी बोलतांना व्यक्त केली.
आमदार देवेंद्र भुयार म्हणाले की, एकनाथ शिंदे अतिशय प्रामाणिक, सर्वाधिक काम करणारे मंत्री, ते काही चुकीचं करतील असा वाटत नाही. सरकारला कुठलाही धोका नाही, या सर्वांचा बाप सिल्वर ओकवर बसलेला आहे. भाजपचे सर्वच नेते एकमेकांच्या संपर्कात राहतात त्याचा अर्थ असा नाही की शिंदे काही चुकीचा निर्णय घेतील.संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीत उघडपणे आमचे नाव घेतले आता त्यांच्याच पक्षातील तीन आमदारांनी मतं दिली नाहीत, आता राऊत काय निर्णय घेतात ते पाहू, असंही भुयार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.