एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली आहे. शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करताच आता आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्याला 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. तर काल संजय राऊत यांनी आमदारांवर दबाव टाकण्यात आला तसेच त्यांचे आपहरण करून त्यांना गुजरातमध्ये नेण्यात आले. त्यातील काही जणांना मारहाण देखील करण्यात आली, असा आरोप केला होता.
आता संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना एकनाथ शिंदे यांनी प्रथमच उत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांचे आरोप फेटाळून लावत असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे म्हटले आहे. संजय राऊत हे आमचे नेते आहेत, असा कोणताही प्रकार लोकशाहीत होऊ शकत नाही. आरोप प्रत्यारोप हा रणनितीचा एक भाग आहे. आम्ही जर आमदारांना गुजरातमध्ये नेले तर ते बळजबरीने आसाममध्ये आले का असा सवालही एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
आम्ही कोणालाही बळजबरी केलेली नाही. संजय राऊत हे आमचे नेते आहेत. तो एक रणनितीचा भाग आहे. आम्ही कोणावरही दबाव टाकला नाही. आम्ही जर त्यांना दबाव टाकून गुजरातला नेले असते, मग ते आसामला कसे काय आले? असा सवालही एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला आहे. तसेच आम्ही दुसऱ्या पक्षासोबत जाण्याचा अद्याप विचार केलेला नाही. आम्ही कोणीच दुसऱ्या पक्षात जाणार नाही. मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे. विकासाचे राजकारण आणि बाळासाहेबांचे विचार मला पुढे घेऊन जायचे आहेत. त्यामुळे हिंदुत्त्वाशी फारकत घेणार नाही.