मुंबई: लाखोंचे मोर्चे काढून मराठा समाजाने मिळलेले आरक्षण न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे कायदाच्या कचाट्यात सापडले आहे. विद्यमान महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाला न्याय देण्यात कमी पडत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर दुसरीकडे मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसत आहे.
आरक्षणावरची स्थगिती उठवण्याची मागणी करत आज मुंबईमध्ये मशाल मार्च काढण्यात येणार आहे. आज संध्याकाळी पाच वाजता वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयापासून मशाल मोर्चाला सुरुवात होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीपर्यंत असणार आहे.
दरम्यान, पंढरपूर येथून देखील राज्यभरातील मराठा बांधव पायी दिंडी काढणार आहेत. पंढरपूर ते मंत्रालयापर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण पंढरपूर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांनी देखील बंदोबस्त वाढवलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून दोन महिन्यांपूर्वी राज्यात लागू करण्यात आलेल्या मराठा आरक्षणाला स्थगिती दिलेली होती. तेव्हापासून राज्य सरकारकडून कोर्टात बाजू मांडण्यात येत आहे.