शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांत फूट पडल्यानंतर त्यातले गट एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी पोहरादेवीत बोलताना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्यावरही टीका केली. त्या टीकेला आता भावना गवळी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी काल पोहरादेवीत घेतलेल्या जाहीर सभेत सत्ताधाऱ्यांसह विविध राजकीय मुद्द्यांवर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी खासदार भावना गवळी यांनाही लक्ष्य केले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्या खासदार ताई तर पळाल्याच होत्या. पण, एकदिवशी फोटो आला, पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधताना. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला आपला देश आहे. मात्र, अख्ख्या देशात तुमच्याच पक्षातील काही दलालांनी आरोप होते की, या खासदार भ्रष्ट आहेत. त्यांच्याच हातून पंतप्रधानांनी राखी बांधून घेतली. पुढे चौकशीचं काय झाले?’, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
दरम्यान, यासंदर्भात काल मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना भावना गवळी यांनी प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगर पालिकेतील कोविड घोटाळ्याला तोंड द्यायला तयार राहावे, असा इशारा गवळी यांनी दिला. भ्रष्टाचाराचा आरोप माझ्यावर सिद्ध झालेला नाही. फक्त त्यावेळी तशी कारवाई झाली होती.
महानगर पालिकेची जी कोविडमधली चौकशी चालू आहे, त्याचाही उल्लेख करायला हवा. कुणी काय केलं ते लवकरच कळणार आहे. चौकशी सुरू आहे. दूध का दूध आणि पानी का पानी होणारच आहे. त्यामुळे फक्त आमच्यावर आरोप करून चालणार नाही”, असं म्हणत भावना गवळींनी आपल्यावर फक्त भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, असा दावा केला आहे.