राज्यात शिंदे फडणवीस यांनी सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेकडून या सरकारवर घणाघाती टीका करण्यात येत असून शिंदे-फडणवीसांकडून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विलंब लावला जात आहे. यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
“मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंच शिल्लक राहिलेत. देवेंद्र फडणवीस नाईलाजास्तव उपमुख्यमंत्री झाले असून त्यांची नाराजी मध्येमध्ये दिसते. केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांचा पोपट केला आहे,” अशी टीका शिवसेना पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.
विनायक राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “शिंदे गट आणि भाजपा यांच्यात तुंबळ युद्ध काही दिवसांत पहायला मिळेल. मंत्रिपद न मिळाल्यास अनेक आमदार मानगुटीवर बसणार आहेत. तोंडाला पाने पुसली गेल्यानंतर 100 टक्के शिंदे गटात बंडखोरी होणार आहे. अतृप्त आत्मे एकत्र आल्यानंतर एकमेकांच्या उरावर बसणार आहेत.”
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी त्यांना स्वत:चा आवाज नाही. त्यांचे बोलवते धनी दिल्लीत आहेत. देवेंद्र फडणवीस नाईलाजास्तव उपमुख्यमंत्री झाले आहेत,” असे यावेळी राऊत यांनी यावेळी म्हंटले आहे.