मुंबई : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या मदतीनं आत्मनिर्भर होऊन महासत्ता बनण्याची भारतामध्ये क्षमता असल्याचे मत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केलं. ‘फ्यूएलिंग इंडिया -2022’ या स्टार्ट अप वित्तपुरवठा संबंधित परिषदेत ते मुंबईत बोलत होते. देशाला महासत्ता बनवण्याचे सामर्थ्य, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रामध्ये आहे. त्यामुळं या उद्योगांमध्ये अधिकाधिक वाढ व्हावी, यादृष्टीनं लक्ष केंद्रित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
देशाच्या एकूण निर्यातीत एमएसएमई क्षेत्राचा वाटा वाढवण्याच्या गरजेवर त्यांनी यावेळी भर दिला. तसेच देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनातही या उद्योगांचा वाटा वाढवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु आहेत, असेही राणे म्हणाले. आपला देश आत्मनिर्भर भारत व्हावा अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा असून, देशातील तरुणही या दिशेने काम करत आहेत. या बळावर आपण आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करु असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाचे अध्यक्ष पी. उदयकुमार, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स फॉर अफर्मेटिव्ह अॅक्शनचे उपाध्यक्ष सुनील झोडे यावेळी उपस्थित होते. पी. उदयकुमार यांनी ऊर्जा क्षेत्रात नवी लाट निर्माण करणाऱ्या नवोदित उद्योजकांची प्रशंसा केली. बहुतेक स्टार्ट-अप माहिती तंत्रज्ञान आणि आर्थिक तंत्रज्ञान आणि डिजिटल क्षेत्रातले आहेत. मात्र, आता ऊर्जा क्षेत्रासारख्या इतर विविध क्षेत्रांमधून अनेक स्टार्टअप येत आहेत. एमएसएमई उद्योगांसाठी सकारात्मक कार्यक्षेत्र निर्माण करणे हे आमचे काम असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही एमएसएमई क्षेत्रात विविध बदल केले त्याचा या उद्योगाला लाभ मिळायला आहे. कोविडच्या काळातही देशातील एमएसएमई क्षेत्र टिकून राहिल्याचे त्यांनी सांगितलं.