नवी दिल्ली | केंद्र सरकारकडून दर महिन्याला 16 लाख नोकऱ्यांची भरती केली जात असल्याचा दावा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला आहे. म्हणजेच दर महिन्याला 16 लाख लोकांना रोजगार मिळत आहे. राजस्थानमधील अजमेरमध्ये सीआरपीएफने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात रेल्वेमंत्र्यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की, केंद्र सरकारकडून दर महिन्याला 16 लाख लोकांना पारदर्शक पद्धतीने नोकऱ्या दिल्या जात आहेत. तसेच ते म्हणाले की, जागतिक आर्थिक संकटाच्या काळातही भारत हा संधींनी परिपूर्ण उर्जेचा स्रोत म्हणून उदयास आला आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. मात्र रेल्वेमंत्र्यांच्या या दाव्यावर सोशल मीडीयावर काही जणांकडून समर्थन केलं जातंय. तर बहुतांश यूजर्सकडून याची खिल्ली उडविण्यात येत आहे.
वैष्णव म्हणाले की, संपूर्ण जगात आर्थिक संकटाची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीतही भारत हा एक ऊर्जास्रोत म्हणून उदयास आला आहे. मोदी सरकारच्या योजनांमुळे प्रत्येक वर्गाचे जीवन सोपे झाले आहे, असे ते म्हणाले. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तरुणांना ‘नेशन फर्स्ट, ऑलवेज फर्स्ट’ हा मंत्र अंगीकारण्याचे आवाहन केले आहे.
ते म्हणाले की, जीवनात त्यांनाच विजय मिळतो. ज्या लोकांनी नेहमीच आपल्या कर्तव्यात राष्ट्राला प्रथम स्थान दिले आहे. तरुणांसमोरील आव्हानांचा संदर्भ देत वैष्णव म्हणाले की, जर तरुणांनी एकच गोष्ट, एक मंत्र लक्षात ठेवला तर त्यांच्या मनात कधीही शंका येणार नाही. यावेळी रोजगार मेळाव्यात नोकरी मिळालेल्या अनेकांना नियुक्ती पत्रांचे वाटपही करण्यात आले.