विविध साखर कारखान्यावर वर्चस्व गाजवणाऱ्या अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खुद्द पवारांनी पाटील यांना पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचेसंकेत दिले होते. तेव्हापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके नाराज असल्याचं बोललं जात होतं. या नाराजीनंतर भगीरथ भालके हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांचा पराभव करून पश्चिम महाराष्ट्रात दबदबा निर्माण करणारे दिवंगत आमदार भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी देत बीआर एस पक्षाचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. सरकोली या गावात तेलंगणाचे के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत. मात्र त्यांच्या या पक्ष प्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेसला पंढरपुरात सुरुंग लागला आहे.
भगीरथ भालकेंनी भारत नाना भालके यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लढवली होती. मात्र त्यांना भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर पक्षात राहून आपल्याला दुय्यम वागणूक दिली जात होती, असा आरोप भालकेंनी अनेकदा केला. मात्र खऱ्या अर्थाने भगीरथ भालके यांचं राष्ट्रवादीला सोडचिट्टी देण्याच कारण ठरलं ते शरद पवार यांच्या उपस्थितीत अभिजीत पटलांना दिलेला पक्षप्रवेश. इतकंच काय तर स्वतः शरद पवारांनी अभिजीत पाटलांना पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देण्याचे संकेत हे देखील भालके यांच्या नाराजीचे प्रमुख कारण ठरले.