मुंबई | ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनानिमित्तं त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. येत्या २६ जून रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडणार असून या सोहळ्याला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त आणि उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.आशा काळे या मराठी नाट्यसृष्टीतल्या एक आघाडीच्या अभिनेत्री आहेत. लग्नानंतर त्यांचे नाव गौरी माधव नाईक असे झाले असले तरी त्या आशा काळे या नावानेच प्रसिद्ध आहेत.
आशा काळे यांचा जन्म २३नोव्हेंबर १९४८रोजी कोल्हापुरात झाला. शालेय शिक्षण कोल्हापूर अणि पुणे येथे झाले. वयाच्या १४व्या वर्षी नाटकांत कामे करावयास सुरुवात केल्याने त्यांना कॉलेजचे शिक्षण मिळाले नाही. कथ्थक नृत्याचे त्यांनी शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले असून त्या सुरुवातीला नृत्याचे कार्यक्रमही करीत. आशा काळे यांचे पहिले व्यावसायिक नाटक, ‘सीमेवरून परत जा’ हे, आणि पहिला चित्रपट ‘तांबडी माती’. त्यांच्या अभिनय कारकिर्दीला २०१५ साली ५० वर्षे पूर्ण झाली.
आशा काळे हे नाव मराठी सिनेसृष्टीत कायम आदराने घेतलं जातं. आजवरच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक गाजलेल्या सिनेमा, नाटकांमध्ये काम केलं आहे. मराठी कलाविश्वातील गुणी आणि सालस अभिनेत्री अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. या पुरस्कार सोहळ्यात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे.