हिवाळी अधिवेशनात आज राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांना नागपूर अधिवेशनादरम्यान निलंबित करण्यात आले.यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विदर्भातील, मराठवाड्यातील, उत्तर महाराष्ट्रातील मागासवर्गीय भागातील प्रश्न विचारात घेऊन विरोधी पक्षाचा प्रस्ताव आज सभागृहात मांडण्यात येणार होता. यात सीमाप्रश्न, महापुरुषांचा होणारा अपमान, नागपूर येथील भूखंड प्रकरण अशा विविध विषय मांडण्यात येणार असताना सत्ताधारी पक्ष काही वेगळ्याच भूमिकेत असल्याची शंका विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांसमोर उपस्थित केली.
जी व्यक्ती आपल्यात हयात नाही तिच्याविषयी काही वक्तव्य करून सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला. यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना बोलण्याची संधी दिली. मात्र विरोधकांनाही आपली भूमिका मांडायची होती. सभागृह चालताना दोन्ही पक्षांना आपली भूमिका मांडण्याची संधी मिळायला हवी होती परंतू असे आज झाले नाही, याउलट नवीन आमदारांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सत्ताधारी आमदारांनी त्यांच्या बहुमताच्या जोरावर केला, असा आरोपही अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.
याच भूमिकेला पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांचा राग असह्य झाला. ते या सभागृहाचे मागील ३२ वर्षापासून सदस्य आहेत त्यांनी अनेक विभागाच्या जबाबदार्या स्विकारल्या आहेत. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आमचा पक्ष काम करतो आहे. ते अतिशय शांतपूर्ण, समन्वयाने वागणारे व्यक्तीमत्व आहे. असे असताना कुठेतरी एखादा शब्द चुकून गेला असताना इतकी टोकाची भूमिका घेणे योग्य नाही असे मत सर्व विरोधी पक्षातील मित्रपक्षांनी मांडले, असेही अजित पवार म्हणाले.