थकबाकीच्या आर्थिक संकटावर मात करण्याचा एक उपाय म्हणून घरगुती व औद्योगिक वापराच्या विजेचे दर महावितणकडून पुढील महिन्यात वाढविले जाण्याची शक्यता आहे. थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती डळमळीत झाल्याने हा पर्याय निवडला जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांकडील कृषी पंपांचे वीज कनेक्शन कापण्यास उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली. चालू बिल भरल्यास कनेक्शन कायम ठेवले जाणार आहे. या निर्णयाचा लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
वीजबिल न भरल्याने कृषी पंपांचे कनेक्शन कापण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली. ती थांबवावी अशी शेतकरी व लोकप्रतिनिधींची मागणी होती. राज्याच्या अनेक भागात लाखो शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झालेले असताना बिलाची सक्तीने वसुली करणे अन्यायकारक ठरेल, हे लक्षात घेऊन चालू वीजबिल भरल्यास कनेक्शन कायम ठेवण्याचा निर्णय फडणवीस यांनी घेतला आहे.
राज्यात कृषी पंपांची ४६ हजार कोटींची थकबाकी आहे. जवळपास ४० लाख वीज कनेक्शन असे आहेत ज्यांच्याकडे थकबाकी आहे. जवळपास ७० हजार कोटींची थकबाकी राज्यातील विविध प्रकारच्या (घरगुती, औद्योगिक, कृषी आदी) वीज ग्राहकांकडे महावितरणची थकबाकी जवळपास ७० हजार कोटी रुपये आहे. त्यामुळे महावितरण कंपनीची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कृषी पंपांचे वीज कनेक्शन कापण्यास सुरुवात झाल्यानंतर स्थगिती दिली गेली पण काही प्रमाणात कनेक्शन तोडणे सुरूच होते.