२०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून खासदारकी द्या, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून केली होती. यावर आता कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशात प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा आणि मागणी करण्याचा अधिकार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
याबाबत आपलं मत मांडताना ते म्हणाले, की देवेंद्र फडणवीस जातीपातीच्या आधारे नाही, तर त्यांच्या स्वतःच्या कर्तुत्वावर इतके वरती आले आहेत.त्यामुळे, पक्ष त्यांच्या कर्तृत्वाचा विचार नेहमीच करतो. ब्राह्मण महासंघाने पत्रात म्हटलं होतं, की प्रत्येक वेळी अखिल भारतीय महासंघ पुण्यात भाजपच्या मागे ठामपणे उभा आहे. त्यामुळे 2024 ला देखील देवेंद्र फडणवीस यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. दरम्यान गोविंदा पथकाला आरक्षणाबाबतच्या घोषणेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, की एखाद्या निर्णयाचा अभ्यास करण्यापूर्वीच बोलणं सुरू केलं जातं. आधीच राज्यात खेळामध्ये आरक्षणाचा कायदा आहे. खेळामधील 5 टक्के आरक्षण आधीच सगळ्या जातींना आहे. फरक फक्त इतकाच आहे, की आधी यात जे खेळ होते, त्यात हा आणखी एक खेळ जोडला गेला आहे.
आम्हीच यात कुठलंही अधिकच आरक्षण दिलं नाही. फक्त नवा खेळ या आरक्षणात जोडला गेला आहे. आता कोणी विटी दांडू आरक्षणात जोडण्याची मागणी केली तर तोही जोडू. सगळ्या गोष्टी सोप्या असताना त्या अवघड करून समाजाची दिशाभूल केली जात आहे. कोणी मागणी केली तर मंगळागौरदेखील यात जोडू, असंही ते म्हणाले