मध्यप्रदेश | संत तुकाराम महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांना आता आपली चूक लक्षात आली आहे. तुकाराम महाराज हे महान संत असून तेच आपले आदर्श आहेत, असं म्हणत धीरेंद्र शास्त्री यांनी हात जोडून महाराष्ट्राची माफी मागितली आहे. वक्तव्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला गेला. त्यामुळे शब्द मागे घेत असल्याचं धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं आहे.
अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या तुकोबांसंदर्भात बोलताना धीरेंद्र महाराजांची जीभ घसरली आणि नव्या वादाला तोंड फोडलं. जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या पत्नीवर टिपण्णी केली. तुकोबारायांची पत्नी त्यांना रोज मारायची म्हणून ते परमेश्वराच्या चरणी लीन झाले, असं वादग्रस्त वक्तव्य या बाबांनी केलं होतं.
महाराजांच्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायाचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. त्यामुळे धीरेंद्र महाराजांनी लवकरात लवकर माफी मागावी अशी मागणी, आचार्य तुषार भोसले यांनी केली होती. तर तुकोबारायांच्या पत्नीबद्दल जे वक्तव्य केलं त्याबद्दल माफी मागावी. ज्यानं लग्नचं केलं नाही त्याला संसार काय कळेल. असा अपमान करणाऱ्यांची टाळकी दुरूस्त करावी लागतील, असा इशारा अमोल मिटकरी यांनी बागेश्वर महाराजांना दिला होता.
तसेच तोंड दिलं म्हणून कारण नसताना बोललंच पाहिजे, असा दुराग्रह संतांचा नसावा, चूक झाली असेल तर माफी मागणं पण एक पुरुषार्थ आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराजांनी केलेल्या वक्तव्यावर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली होती.