शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाच्या ३५ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात अगदी वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत असून दुसरीकडे भारतीय जनता पक्षामध्ये बैठकांच्या फेऱ्या वाढल्या आहेत याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले आहेत. दिल्लीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतील.
महाराष्ट्रात भाजपकडून सत्ता स्थापनेसाठीचा दावा कधी करण्यात येईल, या प्रमुख मुद्दयावर या भेटीत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. काल एकिकडे सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने कौल दिला असताना शिंदे गटातील आमदारांवरची अपात्रतेची कारवाई तूर्तास टळली आहे. त्यामुळे शिंदे गटासमोरील आव्हाने कमी झाली आहेत. तर एकडे भाजपच्या गटातील हालचालीही वाढल्या आहेत.
शिंदेंच्या बंडखोरीमागे आमची काहीही भूमिका नसलेले भाजप कालपासून आत्मविश्वासाने वावरत आहे. एकिकडे सुप्रीम कोर्टाचा निकाल लागत होता, तसा देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजपच्या गोटातील नेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक काल सागर बंगल्यावर झाली. त्यात महाराष्ट्रातील नवीन सरकार स्थापनेसाठी काय रणनीती आखायची यावर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.