राष्ट्र्वादीत उभी फूट पडल्यानंतर आज अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना विविध मुद्दयांवर भाष्य करत थेट राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा आणि आपले काका शरद पवार यांचावर निशाणा साधला. मी जातीपातीचे, नात्यागोत्याचे राजकारण केले नाही. मी त्यात अडकलो नाही. कुणी कार्यकर्ता आला तरी त्याचे काम करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले. सकाळी लवकर कामाला सुरूवात करतो.
देशाचे पहिल्या नंबरचे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख झाली पाहिजे हे माझे स्वप्न आहे. ही वेळ राष्ट्रवादीवर का आली? मी राजकीय जीवनात काम करताना साहेबांच्या छत्रछायेखाली मी घडलोय, तयार झालोय यात तिळमात्र शंका नाही. प्रत्येकाचा काळ असतो. आपण साधारण वयाच्या २५ व्या वर्षापासून ७५ पर्यंत उत्तमरितीने काम करू शकतो असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
अजित पवार म्हणाले की, साहेबच आमचे दैवत आहेत. आज देश आणि राज्य पातळीवर राजकारण सुरू आहे. राजकीय पक्ष लोकांच्या हितासाठी काम करण्यासाठी स्थापन करतोय. संविधानाचा, देशहितासाठी, सर्व समाजातील घटकांना न्याय मिळावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वप्न साकार करण्यासाठी आपण काम करतोय. पक्ष वाढला पाहिजे, खासदार, आमदारांची संख्या वाढली पाहिजे. नवीन कार्यकर्ते पुढे आले पाहिजे हे चक्र असले पाहिजे असं त्यांनी म्हटलं.